Friday, 20 March 2020

कहानी घर घर की...

"अगं बाळोबा ४ महिन्यांचा झाला, खिमटी द्यायला सुरुवात कर... " "पण डॉक्टरांनी ६ महिन्यांपर्यंत दुधाशिवाय काही द्यायचं नाही सांगितलं आहे" इति बाळाची आई. "केवढे लोकं आले होते हॉलवर, दृष्ट काढून टाका मनीची... " "दृष्ट बिष्ट असं काही नसतं ग" एकासूरात छोट्या मनीच्या आईबाबांच उत्तर. आजकाल असे दोन पिढ्यांमधले विसंवाद प्रत्येक गोकुळात ऐकायला मिळतात.
आजच्या आधुनिक आईबाबांना दृष्ट काढणे, करदोडा बांधणे, टिट लावणे या गोष्टी अजिबात पटत नाहित. पण नातवंडांना दुधावरच्या सायीसारखं जपणाऱ्या आजीआजोबांना कशातच कसूर ठेवायची नसते. बाळाला धूरी देणे, डोळ्यात काजळ घालणे, मध चाटवणे, बाळघुटी देणे या गोष्टी डॉक्टरांनीच नाही सांगितल्यामुळे नवीन आईबाप थोडीच ऐकणार आहेत मागच्या पिढीचं. अर्थात प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय करणं असतात. धूरी दिल्यामुळे श्वसनाचे रोग उद्भवू शकतात, काजळामध्ये केमिकल्स असू शकतात, हातात बांधलेले दोरे ओले राहिल्यास त्यात बॅक्टरीयाची वाढ होते आणि तेच जर चुकून तोंडात गेले तर इन्फेक्शन होऊ शकते. पण या गोष्टी जर नीट समजावून दिल्या तर वादंग खचितच टळेल.
याचा अर्थ असाही नाही की पूर्वीच्या सर्व रीती हानिकारकच होत्या. डॉक्टर त्यांच्या निरीक्षणांचे ठोकताळे बांधून सरसकट सर्वानाच लागू करतात. पण प्रत्येक बाळ, त्याची प्रकृती, त्याची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. एका बाळाला आलेला अनुभव सर्वानाच येईल असं नाही. त्यामुळे इच्छेप्रमाणे, बेताने, अंदाज घेऊन काही गोष्टी केल्या तर खरच चालू शकते. वडीलधारी मंडळी बाळाच्या काळजीपोटी किंवा हितासाठीच तर सांगत असतात. त्यांच्या समाधानासाठी दृष्ट काढणे, पायात वाळे घालणे यासारख्या निरुपद्रवी गोष्टी केल्या तर बिघडते कुठे? प्रत्येक वेळी प्रॅक्टिकल विचार करण्यापेक्षा थोडं इमोशनल झालं तर काय हरकत आहे! दोन्ही पिढ्यांनी समन्वय साधून कुठेतरी सुवर्णमध्य गाठलाच पाहिजे तरच गोकूळ हसरे राहिल.😀😀 

वृषाली पाठक

No comments:

Post a Comment

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...