Thursday, 5 February 2026

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते" या 'जीव भांड्यात पडणे' उक्तीची पुरेपूर अनुभूती घेतली.


३ फेब्रुवारी ला मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ एक प्रोपेलिन गॅस टँकर उलटला आणि महाराष्ट्राने सर्वात मोठी वाहतूक कोंडी अनुभवली. अतिशय ज्वलनशील असलेल्या या गॅसमुळे प्रशासकीय यंत्रणांना परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागत होती. परिणामी २२ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी आणि वाहनचालक अडकून पडले होते.

आम्ही ४ तारखेला दुपारी ४.३० ला निघून तब्बल १६ तासांनी सकाळी ८.३० वाजता डोंबिवलीला पोहोचलो. मधल्या कामशेत ते लोणावळा या फक्त १७-२० किमीच्या पट्ट्यासाठी १० तास गेले.

खरं तर मी आणि माझे कुटुंबीय अपघाताच्या दुसऱ्या दिवशी जवळपास २४ तास उलटून गेल्यावर निघालो होतो. आमच्या बस एजन्सीला (PinkBus) दोन तीनदा फोनवरून विचारपूस करून त्यांनी रस्ता सुरू असल्याची खात्री दिल्यामुळे तसेच पर्यायी मार्गांच्या उपलब्धतेमुळे आम्ही विश्वास टाकून निघालो. सुरुवात तर चांगली झाली पण कामशेतपासून जो ट्रॅफिक लागला तो पाठच सोडेना. गुगल वर नेहमीचे रस्ते पूर्ण बंद दाखत होते, फक्त ताम्हिणी घाटाचा रस्ता चालू होता तरीही ड्रायव्हर ने गाडी ओल्ड हायवेने घेतल्यामुळे विचारणा केल्यावर "सेठने जैसे बोला वैसे किया", "हम खुद भी परेशान है" अशी उत्तरं मिळाली. वर सेठचं तेच तुणतुणं, "रोड चालू है". संतप्त प्रवासी हवालदिल झाले होते. काहीना खूप भूक लागली होती. पुढील रस्त्याच्या परिस्थितीची काहीच कल्पना मिळत नव्हती. ११ वाजले तरी गाडी तिथेच होती. अधेमधे १० मीटर पुढे सरकारची परत 'जैसे थे'.

ड्रायव्हर-क्लिनर वर थोडं तोंडसुख घेऊन मीपण इतर पर्यायांचा विचार करू लागले. परत जाण्यासाठी एखादी OLA किंवा UBER मिळते का किंवा मुक्कामासाठी हायवेजवळच एखादे सुरक्षित हॉटेल सापडते का ते शोधत होते. माझ्यासोबत माझी लहान मुलं (२ वर्षे, ६ वर्षे) भाची (११ वर्षे) आणि इतर ३ सदस्य होते. दमल्यामुळे मुलं तर झोपली होती पण जागी झाल्यावर किती साथ देतील याची शाश्वती नव्हती. आम्ही खाऊचे डबे पाणी बरोबर घेतल्यामुळे खाण्यापिण्याचा काही त्रास नव्हता पण हे असं अधांतरी किती काळ राहणार काहीच कल्पना येत नव्हती. रात्री १२ वाजून गेले तरी कार्ला परिसरात अडकून पडलो होतो. सतत Google maps बघून अंदाज घेत होतो. Social media वर news आणि reels बघून पॅनिक होत होतो. मधे कधीतरी आम्ही सर्व महिला washroom च्या शोधात बाहेर पडलो. आजुबाजूच्या सर्व गाड्यांनी त्यांचे headlights बंद करून आमची सोय केली.

रात्रीच्या वेळी अवजड वाहने, ट्रक्स, टेम्पो हे आपापल्या गाड्या बंद करून तिथेच रस्त्यात झोपून गेलेले.  बिचाऱ्या ड्रायव्हर-क्लिनर ने त्यांना उठवून उठवून गाड्या बाजूला घ्यायला लावल्या. अधेमधे wrong way घेवून थोडे अंतर पार केले आणि साधारण दीड वाजता लोणावळा टोल नाक्याआधी एका टपरीवर गाडी थांबवली. आमच्या मागे बऱ्याच गाड्या तिथे आल्या आणि खाण्यासाठी एकच झुंबड उडाली. आम्ही अक्षरशः तिथल्या माणसाच्या डोक्यावर बसून मुलांसाठी मॅगी करून घेतली. मागच्या एका हॉटेलमध्ये रूमची चौकशी पण केली पण शेवटी बसच सुरक्षित वाटली आणि निघालो पुढे.  आता सर्वांनी परिस्थिती स्वीकारली होती. पेंगत पेंगत सर्वजण वाट बघत राहिले. मधे एक ठिकाणी पोलिसांची गाडी पुढे जाताना दिसली, रस्ता मोकळा करण्यासाठी आली असेल बहुदा.

शेवटी सकाळी ६ वाजता लोणावळा exit घेऊन घेऊन आम्ही एकदाचे एक्सप्रेसवेला लागलो. पूर्ण रस्ता मोकळा होत त्यामुळे जीवात जीव आला. रात्रभराचा मानसिक आणि शारीरिक शीण कमी होऊन हायसं वाटलं. अखेरीस आम्ही ८.३० वाजता मुक्कामी पोहोचलो आणि अशा प्रकारे या सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचे साक्षीदार झालो.

अर्थातच झालेला अपघात हा गंभीर स्वरूपाचा होता. हवेत मिसळलेल्या गॅसमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.  बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला बारीक स्पार्क जरी झाला असता तरी ५ किलोमीटरचा परिसर उध्वस्त झाला असता. यात प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलिस, NDRF, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनी कर्मचारी, क्रेन वाले, फायर ब्रिगेड आणि बरेच अजून यांच्या प्रयत्नांनी ३३ तासांनंतर रस्ता मोकळा झाला. 

पण या सगळ्यातून एक गोष्ट समोर येते की, अशा घातक केमिकल्सच्या दळणवळण नियमावलीत अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल करण्याची आवश्यकता आहे का किंवा, अशा अपघातांसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने काही विशेष कार्यपद्धती अवलंबली पाहिजे का जेणेकरून परिस्थिती लवकर आटोक्यात आणता येईल.

प्रशासन या गोष्टींचा नक्की विचार करेल ही आशा!

Sunday, 15 May 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग ४

असं म्हणतात, "If there is magic on this planet, it is contained in water"  कोणताही जलाशय; मग नदी असो, खळाळता ओढा असो, धबधबा असो, शांत तलाव असो किंवा समुद्र.. या कोणत्याही ठिकाणी गेलं कि मन उल्हासीतच होतं! पण या सर्वांमध्ये समुद्राचं पारडं जरा जडच.. अथांग निळाई, क्षितिजाच्याही पलीकडे दूरवर पाणीच पाणी आणि उसळत्या लाटा; लांबूनच ती समुद्राची गाज ऐकली कि अधीरतेने पावलं झपझप आवाजाच्या दिशेने वळतात... 
समुद्रकिनारे नेहमीच आनंद देतात आणि त्यात भारताच्या पूर्व किनाऱ्यांची मजाच वेगळी. पूर्व किनारपट्टीच्या संथ उतारामुळे येथील समुद्रकिनारे खूपच कमी धोकादायक आहेत. लांबच लांब विस्तीर्ण, मऊसूत वाळूचे नयनरम्य किनारे, तरीपण तुलनेने कमी गर्दीचे..  त्यामुळे डुंबायला खूप मजा येते. पाँडिचेरी तर बीचेस साठी फारच प्रसिद्ध! प्रोमोनेड बीच, रॉक बीच, सेरेनिटी बीच, एडन बीच, ऑरोविल बीच.... पण या सर्वांमध्ये अतिशय सुंदर  म्हणजे पॅराडाईझ आयलंड बीच. 
नदीच्या बॅकवॉटरमुळे नैसर्गिकरित्या येथे एक बेट सदृश ठिकाण निर्माण झालं आहे. एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये सोनेरी वस्त्रगाळ वाळूची पुळण.. अत्यंत आकर्षक आणि मोहक... 
चिन्नमवार बोटींग क्लब मधून येथे बोटीने जाता येते, हि सहल पण खूप निसर्गरम्य असते. आम्ही मात्र रस्त्याने मोठा वळसा घालून याठिकाणी गेलेलो. दोन मोठी रिसॉर्ट्स याबाजूने वसली आहेत. 'सॅण्ड ड्यून्स बीच' अशा नावाने ओळखला जाणारा हा बीच चा भाग! पार्किंग ची चांगली सोय आहे. माफक एन्ट्री फी देऊन आतमध्ये गेलो तर एकदम स्वच्छ परिसर, छोटे वळणदार पदपथ, जागोजागी फुलझाडं, दोन-तीन बैठी कार्यालयं, खूप साऱ्या चेंजिंग रूम्स, ओपन शॉवर, प्रसाधनगृह, उपाहारगृह... पर्यटकांचा विचार करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध! नदीच्या बॅकवॉटर मध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्स चा विभाग, दुसऱ्या बाजूला चेंजिंग रूम्सची आडवी ओळ ओलांडून पुढे गेलं कि सोनेरी रंगात चमकणारी वाळू आणि दुधाळ फेसाळत्या लाटांचा निळाशार बंगालचा उपसागर 😀
किनाऱ्यालगत पर्यटकांना विसाव्यासाठी मालदीव्हज् च्या धर्तीवर झावळ्यांपासून बनवलेले शॅक्स (झोपड्या) आहेत. बसायला बाकडी आहेत. बाजूला पाणी, शीतपेये, खाऊ विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. आम्ही भरदुपारी पोहोचल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत होता. तिथेच जरावेळ लाटांची गाज ऐकत बसलो. आमच्या अडीच वर्षाच्या ध्रुव चे वाळूत उद्योग सुरु झाले, ती मऊ हुळहुळणारी वाळू चौखूर उधळायचे काम एकाग्रतेने चालू झाले, हात, पाय, कपडेच नाही तर केस, कान सर्व वालुकामय झालेले. नंतर हॉटेल वर गेल्यावर त्याला नखशिखांत घासूनपुसून अंघोळ घतल्यावरच त्या वाळूपासून सुटका झाली. उन्हं उतरल्यावर पाण्यात जाऊ असं ठरवून उपाहारगृहाच्या दिशेने मोर्चा वळवला. त्या शंभर मीटर्सच्या वाळुप्रवासात पाय चांगलेच पोळून निघाले. चविष्ट खाद्यपदार्थांवर ताव मारत मस्त एक-दीड तास टाईमपास करून, कपडे बदलून आम्ही डुंबायला तयार झालो... अधीरतेने पाय त्या चमकणाऱ्या पाण्याकडे वळवले. लाटांचा पहिलाच स्पर्श मनाला सुखावून ताजातवाना करून गेला. हळूहळू आत उतरलो; गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत मग छातीपर्यंत लाटांवर लाटा आदळू लागल्या. मागे किनाऱ्याशी उभ्या असलेल्या आमच्या आयांच्या दटावणीला न जुमानता आम्ही डुंबत होतो. लाट अली कि त्यात सूर मारत होतो, (नसलेलं) पोहण्याचं कौशल्य आजमावत होतो, उगाचच पाण्यात डोकं टाकून श्वास रोखून धरत होतो, वरच्या जगाशी डिस्कनेक्ट होऊन पाण्याशी एकरूप होत होतो. 
ध्रुवशी दंगामस्ती करून करून बऱ्याच वेळाने नाईलाजानेच पाण्याच्या बाहेर पडलो. मग तो ओपन शॉवर खाली चिकटलेली वाळू धुऊन काढण्याचा सोपस्कार झाला. 
छान फ्रेश होऊन समुद्रकाठाने भटकंती करत निसर्गाची रंगपंचमी अनुभवू लागलो. समोर क्षितिजावर निळं पाणी आणि आकाश कुठे एक होतंय पत्ता लागत नव्हता. विरुद्ध दिशेला सूर्य अस्तास जात होता, पिवळ्या केशरी गुलाबी रंगांची उधळण चालू होती. एका ठिकाणी बीच बर्थडे पार्टी ची तयारी चालू होती. मनोमन 'किती नशीबवान व्यक्ती आहे' असं म्हणत कौतुकाने त्या वाळूत उभारलेल्या तंबूकडे आणि झुळझुळ उडणाऱ्या पडद्यांकडे न्याहाळत होतो.  आता उंट, घोडे यांच्या सावाऱ्या पण सुरु झाल्या होत्या. किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांची संख्या पण वाढल्याचे लक्षात आले. सर्वजण धकाधकीच्या जीवनातून मन:शांती साठी, विसाव्यासाठी, स्वात:मधे अथवा निसर्गामधे रममाण व्हायला आले होते. पाण्यातील जादू अनुभवत होते. 
काही वेळाने सूर्य पूर्णपणे मावळला आणि नभात फक्त गुलाबी छटा उरली. अत्यंत तृप्त मानाने आम्ही परत फिरलो आणि 'The Best Day in Pondicherry' असं  घोषित करून आमच्या हॉटेल वर परतलो.
क्रमश:

Sunday, 6 March 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग ३

पाँडिचेरी भेट श्री अरविंद आश्रम आणि ऑरोविल पाहिल्याशिवाय, त्यांचे कार्य जाणून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक अरविंद घोष अशीही एक श्री अरविंदांची ओळख आहे. जहाल क्रांतिकारक ते महायोगी हा त्यांचा जीवनप्रवास खूपच आगळा आहे. श्री अरविंद स्वतः त्यांची ओळख आधी एक कवी, मग क्रांतिकारक आणि शेवटी योगी अशी करून द्यायचे पण आजच्या घडीला जग त्यांना अगदी उलट क्रमाने ओळखते. बंगालच्या फाळणीनंतर त्यांचा राजकीय कार्यात सहभाग वाढला. वंगभंग चळवळीतून त्यांनी जाहीरपणे स्वात्रंत्र्यलढ्यात भाग घेतला. लोकमान्य टिळकांचे सहकारी बनून अनेक क्रांतिकार्यांमध्ये सहभागी झाले. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी केलेल्या बॉम्बहल्ला प्रकरणात गोवले गेल्यामुळे त्यांना अलिगढ येथे कारावास भोगावा लागला. या सर्व काळामध्ये अरविंदांचा ओढा अध्यात्माकडे वाढला. इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते पॉंडिचेरीमध्ये जाऊन राहिले आणि संपूर्ण निवृत्ती स्वीकारून योगसाधनेमध्ये स्वतःला झोकून दिले. पाँडिचेरी हीच त्यांची कर्मभूमी आणि योगभूमी ठरली. 
चार पाच शिष्यांच्या साथीने १९२६ साली योग आणि अध्यात्मिक साधनेसाठी श्री अरविंद आश्रमाची स्थापना केली गेली. आता त्या आश्रमात अरविंदांची समाधी आणि ग्रंथालय सोडून बाकी काही नाही. काटेकोर शांतता पाळली जाते. एके दिवशी सकाळीच आम्ही आश्रमाला भेट द्यायला निघालो. मोबाईल बंद करून आम्ही आतमध्ये शिरलो; जुन्या वाड्यासारखे दुमजली बांधकाम, मध्यवर्ती अंगणाभोवती असलेला खोल्यांचा समूह आणि खोल्यांना लागून खांबांचा आधार देऊन बांधलेले सोपे/ व्हरांडे... विविध फुलझाडांनी सुशोभित केलेल्या मधल्या अंगणात एका वृक्षाखाली योगी अरविंदांची समाधी आहे. तेथेच एका पायरीवर बसून आम्ही ते दृश्य न्याहाळलं; एका चित्राप्रमाणे स्तब्ध आणि सुंदर.. थोडीजरी हालचाल झाली तर रसभंग होईल असं! संपूर्ण वातावरणात अध्यात्मिक, सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि क्वचितच मिळणारी नीरव शांतता अनुभवायला मिळते. एका खोलीत अरविंदांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. येथील ग्रंथालयात अरविंदांच्या विविध भाषांमधील, विविध विषयांची अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  अरविंदांनी संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी तत्वज्ञान सांगितले; माणसाला सुख आणि समाधान बाह्य साधनांनी मिळू शकत नाही तर ते आतूनच यावे लागते असे अरविंदांना वाटायचे.
आश्रमाची स्थापना करताना त्यांना मिसेस मीरा अल्फासा (उत्तरआयुष्यातील श्रीमतीजी, The Mother) आणि त्यांचे पती पॉल रिचईस यांचा सहयोग लाभला. ऑरोविल ची संकल्पना आणि उभारणीमध्ये श्रीमंतीजींचे महत्वाचे योगदान आहे. अरविंदांचे तत्वज्ञान जागतिक पातळीवर नेऊन या प्रायोगिक वैश्विक नगरीची स्थापना केली आहे. ऑरोविल हे तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यात (पॉंडिचेरीपासून सुमारे १० किमीवर) वसलेले यूनेस्कोसमर्थित आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे ५९ देशातील सर्व वयोगटाच्या विविध जातीधर्माचे, भाषांचे, संस्कृतीचे सुमारे २५०० नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मानवता हाच धर्म. या शहराचा गाभा म्हणजे मध्यभागी उभारलेलं मातृमंदिर. हे एक योगसाधना किंवा प्रार्थनास्थळ आहे. दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. छोट्याश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दाट झाडीतून साधारण दोन किलोमीटर पायपीट केल्यावर भव्य मातृमंदिराचे दर्शन घडते. बहिर्गोल सोनेरी तबकड्यांनी बनवलेली वैशिठ्यपूर्ण गोलाकार रचना, त्यावरून परावर्तीत होणारा सूर्यप्रकाश, हरखून जायला होते. या संपूर्ण परिसराचे व्यवस्थापन खूप छान केले आहे. बागबगीचे, मोठमोठाले वटवृक्ष, सागवानी लाकडाची झाडे यांची चोख निगराणी केली जाते. जागोजागी माहितीचे फलक लावले आहेत. वाटेतल्या माहितीकेंद्रात मातृमंदिरावर बनवलेली चित्रफीत पाहता येते. मातृमंदिराच्या आत असलेल्या इनर चेंबर मध्ये फक्त योगसाधकांनांच जायची परवानगी आहे. यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करून आत ध्यानधारणेसाठी जात येते. ध्यान कक्षात ७० सेमी व्यासाचा एक क्रिस्टल ग्लोब स्थापन केला आहे. सूर्यप्रकाश डायरेक्ट ग्लोबवर पडेल अशा पद्धतीने रोज सूर्याच्या स्थानानुसार बाहेरील सोन्याच्या तबकड्या सरकवाल्या जातात आणि सूर्यप्रकाश त्या ग्लोबमधून इनर चेंबरमध्ये प्रतिबिंबित केला जातो. मला तर या भविष्यवेधी रचनेत काहीतरी गूढ/सुप्त हेतू असावा असे वाटायला लागले; खूप काल्पनिक विज्ञानकथा/ कादंबऱ्या वाचनाचा परिणाम असेल बहुदा!🙂🙂

मातृमंदिर

मातृमंदिर परिसर
महाकाय वटवृक्ष
मानवी एकता प्रत्यक्षात उतरवणे हाच ऑरोविलचा उद्देश. कोणताही धर्म मनाला जात नाही, राजकारण नाही कारण सरकारच नाही, जेष्ठ मंडळीच शहराची धूरा सांभाळतात. पैशांचे व्यवहार नाहीत, यांचे स्वतःचे उद्योग, संशोधन संस्था आहेत. जगातील कोणीही व्यक्ती इथे राहू शकते, अट एकच ती म्हणजे येथे सेवक बनून राहणे!
येथे भेट देणाऱ्या प्रात्येकाच्या मनात निदान एकदातरी हा विचार नक्कीच येतो.
क्रमश:

Sunday, 27 February 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग २

पॉंडिचेरी माझ्या दृष्टीने अजून एका कारणासाठी  महत्वाचे आहे, इथे JIPMER (Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research) नावाची खूप विख्यात वैद्यकशास्त्र संशोधन संस्था आहे. या संस्थेतील माझी सहयोगी आणि मी (NIIH, KEM Hospital) मिळून आमच्या PhD चे बरेच संशोधनकार्य एकत्रित केले आहे. विविध सेमिनार किंवा परिषदांमध्ये भेटल्यावर तिच्याकडून पॉंडिचेरीचे खूप वर्णन आणि गोष्टी ऐकल्या होत्या ज्या मनात घर करून राहिलेल्या. 
ढोबळमानाने पाँडिचेरी च्या इतिहासाचे तीन भाग पडतात; पुरातन, मध्ययुगीन आणि आधुनिक. या नगरीच्या क्षेत्रात 'वेदपुरी' वसलेली असावी असे मानतात. अगस्त्य ऋषींचा तिच्याशी संबंध असावा असे मानले जाते. साधारण चौथे ते पंधरावे शतक हा काळ पल्लव, चौल आणि पांड्य राजवटींचा होता. आधुनिक इतिहास सुरु होतो तो विजयनगर साम्राज्य आणि पुढे विजापूरकर सुलतानांच्या सत्तेपासून. पण पाँडिचेरीला खरी ओळख मिळाली ती सतराव्या शतकात, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी च्या काळात. हा प्रदेश महत्वाचे व्यापारी बंदर म्हणून उदयास आला. 
शिवाजी महाराजांच्या सुभेदारांनी कर्नाटक मोहिमेत पाँडिचेरी तात्पुरती जिंकली पण फ्रेंचांचे व्यापारी परवाने तसेच चालू ठेवले. राजाराम महाराज जिंजीला आल्यावर पाँडिचेरी मराठे आणि मुघल यांच्या कात्रीत सापडली. ती एका तहानंतर परत फ्रेंचांना मिळाली (१६९७) आणि वसाहत वाढीस लागली. पुढे गव्हर्नर जनरल ड्युप्लेक्स च्या काळात फ्रेंच सत्तेचा परमोत्कर्ष झाला. स्वातंत्र्यानंतर १९५४ साली हा प्रदेश भारतात विलीन झाला पण अजूनही पाँडिचेरीमध्ये फ्रेंच संस्कृतीचा खूप पगडा आढळतो.
महाबलीपूरमवरून निघाल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मुक्कामी पोहोचलो. आमचं हॉटेल भरवस्तीत व्हाईट टाउन पासून अगदी १०-१५ मिनिटांवर होतं. व्हाईट टाउन हा पॉंडिचेरीचा किनाऱ्याजवळील अगदी आखीवरेखीव फ्रेंच कॉलनी चा भाग आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण! येथील फ्रेंच स्थापत्यकलेच्या इमारती, त्यांचा मोहक पिवळा, अबोली किंवा पांढरा रंग, जुने मोठे वाडे त्यांचे प्रशस्त अंगण, विशिष्ठ रचनेच्या बाल्कनीज त्यातून बाहेर डोकावणाऱ्या वेली... काहीकाळ आपण विसरूनच जातो कि भारतात आहोत. अगदी रस्त्यांची नवे आणि फलक पण फ़्रेंच भाषेत आढळतात. सरकारी कामकाजात पण काही प्रमाणात फ्रेंच भाषा वापरली जाते. फ्रेंच पाळेमुळे असलेली कुटुंबे आजही इथे राहतात. उगाच नाही पाँडिचेरी ला 'द लिटिल फ्रान्स ऑफ इंडिया' म्हणतात!  व्हाईट टाउन च्या परिसरातील विविध कॅफे, उपहारगृह आणि रेस्टॉरंट्समधे फ्रेंच पाककृतींचा आस्वाद घेता येतो. खवय्यांनी एकदातरी याठिकाणी भेट देऊन जिभेचे चोचले पुरवून घ्यावेत.
पाँडिचेरी चा USP म्हणजे इकडचा समुद्रकिनारा. खूप अप्रतिम समुद्रकिनारा, ज्याकडे तासंतास फक्त पाहतच राहावंसं वाटतं. लाटांच्या आवाजात, मऊसूत वाळूत चालत, खेळत वेळ कसा जातो कळतच नाही. याला प्रोमोनेड अथवा रॉक बीच असेही म्हणतात. किनाऱ्याला समांतर सरळसोट असलेला हा रस्ता पूर्णपणे वाहनविरहित आहे. या रस्त्यावरून वाहने, अगदी सायकल पण चालवायला परवानगी नाही. कसेही फिरा, रहदारी किंवा हॉर्न यांची पर्वा करायची काही गरज नाही. बीचच्या एका टोकाने फ्रेंच वॉर मेमोरियल पासून सुरुवात करून शेवटी ओल्ड पोर्ट पर्यंत दिड किलोमीटरचा मस्त मोकळा रस्ता... मधे भारती पार्क, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, फ्रेंच गव्हर्नर मार्कस ड्युप्लेक्स यांची स्मारके लागतात. 
आमच्या चार दिवसांच्या वास्तव्यात आम्ही रोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला जायचो. समुद्राच्या क्षितिजापलीकडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाला बघताना भान हरपून जाते. पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना हे दृश्य निराळंच..  योगायोगाने आम्ही गेलेलो तेव्हा माघ पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या चांदण्यात चमकणाऱ्या लाटा अनुभवण्याचं सुख लाभलं आणि तामिळ लोकांचा माघ महोत्सव बघण्याची पण संधी मिळाली. या महोत्सवात कार्तिकस्वामी, श्रीगणेश, बालाजी महाराज, दुर्गादेवी यांच्या रथयात्रा निघतात आणि दिवसभर विविध प्रमुख रस्त्यांवरून फिरून परत मंदिरात विराजमान होतात. खूप लोकं दर्शनासाठी रस्त्यांवर उभी राहतात, छोट्या-मोठ्या मातीच्या घाडग्यात काहीतरी भोग चढवतात. सगळं शांतपणे, काही घाईगडबड किंवा ढकलाढकली नाही.
अशा या फ्रेंच तामिळ संस्कृतीचं मिश्रण असलेल्या शहराचे विविध पैलू आमच्यासमोर उलगडत होते.
क्रमशः

Friday, 25 February 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा

भाग १

बरंच पूर्वीपासून पॉंडिचेरी (आताचे पुदुचेरी) बकेट लिस्ट मध्ये होतं पण योग येत नव्हता. लहानपणापासूनच मला केंद्रशासित प्रदेशांबद्दल कुतूहल होतं, या ठिकाणांना वेगळा महत्व दिलंय भारत सरकारने. त्यात पाँडिचेरी सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या खूपच वेगळं.... 
हा केंद्रशासित प्रदेश चार विलग (एकमेकांपासून खूप दूर) जिल्ह्यांनी मिळून बनलेला आहे. पॉंडिचेरी आणि करैकल तामिळनाडू मध्ये तर यानम आंध्र प्रदेशात आणि माहे केरळमध्ये. या चारही प्रदेशात पूर्वी फ्रेंचांची वसाहत होती. १९५४ साली हे चार जिल्हे एक केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात विलीन झाले. आम्ही निघालो होतो पाँडिचेरी जिल्ह्यात, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि बाकी तीनही बाजूंनी तामिळनाडूने वेढलेला प्रदेश.... 
पाँडिचेरी साठी रस्त्याने आणि ट्रेनने साधारण २४-३६ तास लागतात. उपलब्ध वेळ आणि कुटुंबातील सदस्यांची वये (२ वर्षे ते ६८ वर्षे) लक्षात घेऊन विमानानेच जायचे ठरवले. चेन्नई विमानतळ ते पाँडिचेरी १४५ किमी चे अंतर ३ तासात पार करता येते. ध्रुवाचा हा पहिलाच विमानप्रवास म्हणून आम्ही खूप उत्साही होतो. कोणत्याही विमानप्रवासातील दोन गोष्टी मला फार आवडतात; एक म्हणजे टेक ऑफ च्या वेळी विमानाचा वेग, साधारण १८० तशी किमी वेगाने विमान रनवे वर धावू लागते तेव्हा खूपच रोमांचक वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर विमान रात्रीचे असेल तर टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे रस्ते आणि त्या प्रदेशाची (विशेषतः मुंबईची) आऊटलाईन.... 
आम्ही जाताना सकाळी लवकर आणि येताना संध्याकाळी उशिरा अशी विमानाची तिकिटे काढली होती म्हणजे येण्याजाण्याच्या दिवसाचा पण वेळ मिळाला. विमानाने साधारण दोन तासात आम्ही चेन्नईला पोहोचलो. आधीच ZoomCar अँपने कार निश्चित केली होती. त्यात बसून आम्ही निसर्गरम्य अशा ईस्ट कोस्ट रोडने (ECR) महाबलीपूरम च्या दिशेने निघालो. 
महाबलीपूरम हे चेन्नईपासून ५५ किमी अंतरावर, एक बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला ग्रेट सॉल्ट लेक यामध्ये वसलेलं आणि दगडाच्या वास्तुशिल्पांसाठी प्रसिद्ध असं शहर आहे.पुरातन काळात हे एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. पल्लव वंशातील पहिला राजा नरसिंहवर्मा याच्या महामल्ल किंवा मामल्ल या उपाधी वरून हे स्थळ मामल्लपूरम म्हणूनही ओळखले जाते. येथील जागतिक वारसा स्थळांचा (युनेस्को हेरिटेज साईट) मान मिळालेली, अखंड दगडात कोरलेली वास्तूशिल्प प्रेक्षणीय आहेत. 
पंच रथ मंदिर, अर्जुनाची तपश्चर्या/ गंगा अवतरण शिल्प हि प्रमुख शिल्प बघून आम्ही महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावरील शोअर टेम्पल (Shore temple) कडे मोर्चा वळवला. हा तीन मंदिरांचा समूह अगदी किनाऱ्यानजीकच घडवला आहे. २००४ सालच्या प्रलयकारी त्सुनामीला तोंड देऊन आजही हे शिल्प दिमाखात उभं  आहे.

पंच रथ मंदिर
 
शोअर टेम्पल
रणरणत्या उन्हात फोटो आणि सेल्फी काढत आमची भटकंती चालू होती. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचाच काय तो आधार! बाजूने कुंपण असल्यामुळे समुद्र समोर दिसत असून सुद्धा फक्त नयनसुख घ्यावे लागले. महाबलीपुरमला सोनेरी वाळूचा सुंदर किनार लाभला आहे. वेळेअभावी बरीच शिल्प आम्हाला बघता आली नाहीत पण कृष्णा बटरबॉल, वराह मंदिर, गणेश मंदिर, दीपगृह ही  स्थळंपण आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. सरत्या दुपारी आम्ही पाँडिचेरी च्या दिशेने परत ईस्ट कोस्टल रास्ता पकडला. 

इस्ट कोस्टल रोड
क्रमशः

Thursday, 23 April 2020

मलेरिया आख्यान भाग ३- मलेरिया निदान आणि उपचार

जागतिक सर्वेक्षणानुसार मलेरिया दर वर्षी अब्जावधी लोकांना होतो आणि त्यातील लाखो रुग्ण दगावतात. आफ्रिका खंड आणि दक्षिण आशियायी देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये भारतातील काही प्रदेशाचाही समावेश आहे. आपण मागच्या भागात पॅरासाईट्सच्या प्रजातींबद्दल जाणून घेतले. सर्वाधिक मृत्यू फॅल्सीपॅरम प्रजातीमुळे होतो तर व्हायवॅक्समुळे सौम्य प्रकारचा मलेरिया होतो. अमेरिकन उपखंडात व्हायवॅक्स अधिक प्रमाणात आढळतो. आफ्रिका खंडात ९०% च्या वर फॅल्सीपॅरम मलेरियाचा प्रादुर्भाव दिसून येतो. याचमुळे एकट्या आफ्रिका खंडात मलेरियाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. २०१८ मध्ये ही आकडेवारी जवळपास ५ लाख होती (संदर्भ, WHO मलेरिया रिपोर्ट).
फॅल्सीपॅरम मलेरिया धोकादायक असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पॅरासाईटच्या वाढीचा वेग. फॅल्सीपॅरम परासाईट लिव्हरमधून बाहेर पडल्यावर रक्तात खूप वेगाने वाढतात आणि धोकादायक पातळी गाठतात. त्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसून आल्यानंतर लवकरात लवकर उपचार करावे लागतात. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी जीवावर बेतू शकते. मलेरियाची तीव्रता बऱ्याच अंशी पॅरासाईट्सचा प्रभावीपणा आणि माणसाची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असते. लाल रक्तपेशींवर हल्ला झाल्यानंतर आपल्या पांढऱ्या पेशी ते आक्रमण दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी जर औषधांचे साहाय्य लाभले तर आजार बरा होऊ शकतो. पण जर प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आजार लवकर बळावतो. फॅल्सीपॅरम पॅरासाईट्स खूप चलाख असतात, आपल्या पांढऱ्या पेशींचे आक्रमण चुकवण्यासाठी ते रक्तातून प्रवास करत आपल्या महत्वाच्या अवयवांमध्ये लपून बसतात आणि तेथील छोट्या रक्तनलिकांमध्ये अडकून राहतात. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे प्राणवायूच्या कमतरतेने हळूहळू अवयव निकामी होऊ लागतात. यामध्ये लिव्हर, किडनी, मेंदू, फुफ्फुसे यांचा समावेश होतो. सेरेब्रल मलेरिया या प्रकारामध्ये फक्त मेंदूवर परिणाम होतो. अचानक भोवळ येणे, शुद्ध हरपणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), पक्षाघात अशी लक्षण दिसून शेवटी माणूस कोमामध्ये जातो. आफ्रिका खंडात पाच वर्षाखालील मुलांना सेरेब्रल मलेरियाचा धोका खूप जास्त प्रमाणात आढळतो. बरेचदा आजार इतका बळावलेला असतो की औषधोपचार पण कामी येत नाहीत. म्हणूनच लवकर निदान खूप महत्वाचे असते. 

निदान

मलेरियाच्या निदानाची सर्वात जुनी आणि खात्रीशीर पद्धत म्हणजे मायक्रोस्कोपी. काचपट्टीवर रक्ताचा नमुना घेऊन लाल रक्तपेशींमधल्या पॅरसाईटचे मायक्रोस्कोपखाली निरीक्षण केले जाते. यासाठी रक्ताच्या नमुन्यावर रंगद्रव्यांची रासायनिक प्रक्रिया केली जाते. या पद्धतीद्वारे मलेरिया पॅरसाईट्सच्या वेगवेगळ्या प्रजातींचेपण निदान होऊ शकते. खालील फोटोत लाल रक्तपेशीतील पॅरासाईट्स (डावीकडे) आणि पेशी फोडून बाहेर पडणारे अनेक पॅरसाईट्स (उजवीकडे) दिसत आहेत. हि मलेरिया निदानाची सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत आहे.


फोटो स्त्रोत- वृषाली पाठक


रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किंवा डिपस्टीक मेथडने खूप कमी वेळात (साधारण २० मिनिटे) मलेरियाचे निदान केले जाते. यामध्ये पॅॅरासाईटच्या चयापचय क्रियेतून बाहेर पडणारी प्रथिने, विकरे (Enzymes) यांचे मूल्यमापन केले जाते. पण याद्वारे पॅॅरासाईटची प्रजाती समजू शकत नाही.
पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (शृंखला अभिक्रिया) तसेच मॉलिक्युलर टेस्ट यांच्या साहाय्याने पण मलेरिया निदान केले जाते. या खूप क्लीष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहेत.   

उपचार

गंभीर व अवयवबाधित मलेरिया रुग्णांच्या उपचारासाठी हाॅस्पिटलच्या अतिदक्षता भागात निगराणीची आवश्यकता भासते. सौम्य प्रकारचा मलेरिया औषधांनी बरा होऊ शकतो.
क्लोरोक्वीन, हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीन ही क्विनाईन गटातील औषधे प्राथमिक उपाययोजनेसाठी वापरली जातात. सध्या आर्टेमीसिनिन गटातील औषधे खूप प्रभावशाली मनाली जातात. खूप वर्षे सातत्याने त्याच औषधांचा वापर झाला तर पॅरासाईट्समध्ये या औषधांना प्रतिरोध (Resistance) विकसित होऊ शकतो. त्यामुळे WHO च्या नियमानुसार मलेरिया औषधांचा वापर समूहात केला जातो. दोन किंवा अधिक प्रकारची औषधे कॉम्बिनेशन मधे दिली जातात. या सर्वांची पॅरासाईटविरोधी कार्यप्रणाली वेगवेगळी असते.
(टिप- कोणतीही औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे हानीकारक आहे)
गेल्या काही वर्षात वाढलेल्या प्रतिरोधामुळे अधिकाधिक औषधसंशोधनाची गरज निर्माण झाली आहे. औषधनिर्मितीचा वेळ (साधारण १०-१२ वर्षे) वाचवण्यासाठी 'औषधांचे पुर्नव्यवस्थापन' ही आता काळाची गरज बनली अहे. याअर्तंगत एका आजारावरची औषधे  तपशीलवार अभ्यासानंतर दुसर्‍या आजारासाठी वापरली जाऊ शकतात. काही प्रतीजैविके (Antibiotics), कर्करोगची औषधे यांच्या मलेरियाविरोधी वापराबाबत संशोधन सुरू अहे. इमॅटिनीब आणि सोराफेनीब (कर्करोगाची औषधे) यांच्या मलेरियाविरोधी गुणधर्मांबद्दलचा माझा शोधनिबंध २०१५ साली प्रकाशित झाला होता. इमॅटिनीबची मलेरिया रुग्णांमधील उपयुक्तता समजून घेण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी वैद्यकिय चाचण्या सुरू आहेत.

इच्छुकांसाठी माझ्या शोधनिबंधाची लिंक खाली देत आहे.
https://www.researchgate.net/publication/277968883_Tyrosine_Kinase_Inhibitors_New_class_of_antimalerials_on_the_horizon

मलेरिया नियंत्रणासाठी नविन कार्यक्षम औषधांची गरज तर आहेच पण त्याचबरोबर WHO च्या परियोजनेनुसार या रोगाच्या उन्मुलनासाठी वाहक म्हणजे डासांवर नियंत्रण तसेच प्रभावी लसीकरण ह्या गोष्टिपण तेवढ्याच आवश्यक आहेत. पुढिल भागात आपण भारताने अवलंबलेल्या त्रिसूत्री कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ.

वृषाली पाठक (Ph.D.)

Friday, 10 April 2020

इन्नी आजी आणि मोदकांची आमटी

'इन्नी आजी' म्हणजे माझ्या आईची आई. खरं तर तिचा नाव विमल पण तिला इन्नी म्हणत असत. खूप गोड वाटायचं तिला इन्नी म्हणताना. ती होती पण तशीच; गोड आणि प्रेमळ!
तिचा नुसता उल्लेखही मला माझ्या बालपणात घेऊन जातो. सर्वप्रथम डोळ्यांसमोर येत ते म्हणजे गावचं घर, आगगाडीसारखं, एकापुढे एक अशा तीन खोल्यांच धाब्याचं घर आणि शेवटच्या खोलीत म्हणजे स्वयंपाकघरात ओट्यावर बसून पोळ्या लाटतांनाची आजीची मूर्ती. कंबरदुखीच्या त्रासामुळे आजी ओट्यावर बसून पोळ्या करायची. खूप गम्मत वाटायची मला त्याची. घरी परत आले की मी आईलाही ओट्यावर बसून स्वयंपाक करायला सांगत असे. रात्री धाब्यावर झोपताना आजी छान छान गोष्टी सांगायची. नक्षत्र, तारे दाखवायची. सप्तर्षी, मृगनक्षत्र, शुक्र, ध्रुवतारा यांच्याशी ओळख तिच्यामुळेच झाली. कोणतेतरी दोन तेजस्वी तारे दाखवून हे 'स्वर्गाचं दार' आहे असंही तिने सांगितलेलं मला आठवतं. माझ्या बालमनाला अचंबित आणि आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी तिच्याकडे होत्या. निरोप घेताना आजी दरवेळी हमखास रडायची. आपल्या लेकीची नातवंडांची परत कधी भेट होईल या विचाराने असेल बहुदा. आम्हाला कवटाळून अगदी करकचून पापी घ्यायची. अजकाल असा हळवेपणा क्वचितच बघायला मिळतो.
आजीच्या असंख्य संस्मरणीय गोष्टींपैकी प्रकर्षाने आठवण करून देणारी एक गोष्ट म्हणजे 'मोदकांची आमटी' हा पदार्थ. ही एक खान्देशी पाककृती आहे. मोदक म्हणजे गोडाचा पदार्थ या संकल्पनेला तडा देत तिखट सारण भरून बाहेरच्या आवरणाला मोदकाचा आकार देऊन ते आमटीत म्हणजे ग्रेव्हीत सोडले जातात आणि ग्रेव्हीपण अश्शी तिखट की खाणाऱ्याला खान्देशी दणका बसलाच पाहिजे. आजीच्या हातची नाकाडोळ्यातून पाणी काढणारी मोदकांची आमटी एकदम प्रसिद्ध होती. घरी आलेल्या पै-पाहुण्यांसाठी खूप कौतुकाने केली जायची. आजीपण खसखस खोबरं यासारख्या गोष्टींचा मुक्तहस्ते वापर करून मोठ्या कलाकुसरीने कळीदार मोदक बनवायची. झणझणीत आमटीत तरंगणारे मोदक म्हणजे पर्वणीच! तोंडचं पाणी पळणार हे माहित असूनही तोंडाला पाणी सुटायचं.
हे परंपरागत पाककौशल्य आजी आणि आईकडून माझ्याकडेपण थोडंफार हस्तांतरित झालं आहे. आजही एखाद्या निवांत रविवारी किंवा खास पाहुण्यांच्या आगमनानिमित्त माझ्या घरी ही आमटी केली जाते. तेव्हा आजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि मन परत भूतकाळात रमतं.

मोदकांची आमटी कशी बनवावी?

साहित्य 
अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं
१ कांदा
लसूण १०-१२ पाकळ्या
२ चमचे खसखस
खडा मसाला- दालचिनी, लवंग (४-५), मिरी (७-८), तेजपान (४-५)
१ वाटी कणिक
अर्धी वाटी बेसन
धने पावडर, जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर, तेल

कृती
# सर्वप्रथम खोबरं, कांद्याचे तुकडे, लसूण, खडा मसाला आणि खसखस वेगवेगळे परतून घ्यावे.
# खडा मसाल्याची बारीक पूड घ्यावी.
# खोबरं, कांदा आणि लसूण यांचेएकत्र बारीक वाटून घ्यावे.

मोदकांचे सारण
# २ चमचे तेलात खोबऱ्याच्या वाटणापैकी अर्धे वाटण परतून घ्यावे . त्यात भाजलेली खसखस, २ चमचे खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, २ चमचे धणे पूड, १ चमचा जीरे पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिसळून घ्यावे.
# शेवटी १ चमचा बेसन टाकून परतावे. पीठाने सरणाला चांगला मेळ येतो.

मोदक
# मोदकाच्या आवरणसाठी १ वाटी कणिक, २ चमचे बेसन, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि १ चमचा तेल टाकून पीठ मळून घावे आणि त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्या. पुऱ्या जाडसर लागल्याने मोदक फुटत नाहीत.
# पुऱ्यांमध्ये सारण भरून त्यांना मोदकाचा आकार द्यावा.

आमटी
# अर्धे उरलेले खोबऱ्याचे वाटण, १ चमचा खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, १ चमचा धने पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकून तेलात चांगले परतून घ्यावे. आमटीसाठी खसखस आणि बेसन वगळता बाकी सर्व कृती सारखीच आहे.
# वाटण व्यवस्थित परतले गेले कि त्यात ३ वाट्या पाणी टाकून व्यवस्थित उकळून घ्यावे.
# बनवलेले मोदक उकळत्या आमटीत टाकून १० मिनिटे वाफवून घ्यावेत.
# वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.


फोटो स्त्रोत- वृषाली पाठक  

Wednesday, 25 March 2020

लॉकडाऊन- एक सुवर्णसंधी

अजून २१ दिवस लॉकडाऊन... आतापर्यंत मोठ्या आनंदाने उपभोगलेली सुट्टी आता जाचक वाटायला लागली ना? अजून एवढे दिवस घरी बसून काय करायचे असा गहन प्रश्न आहे सर्वांपुढे. कोरोनाचे भय आणि सामाजिक बांधिलकी यामुळे बाहेर तर पडता येणार नाहीये, त्यामुळे घरच्या घरीच विरंगुळा शोधावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसात नेहमीच टीकेचे लक्ष्य झालेल्या Social sites, Netflix, Amazon Prime यांचे वजन आता चांगलेच वाढले आहे. Virtual Get-togathers, Serial binge watching, online games यांना उधाण आले आहे. FB, WhatsApp स्टेटस वर कुटुंबियांसोबत घालवलेल्या मजेदार क्षणांचे सेल्फीज पाहायला मिळत आहेत. कुणी मस्त चटकदार पदार्थ बनवतय, कुणी गाणी म्हणतय, कुणाचं योगा, कुणाचं पुस्तकवाचन सुरु आहे, कुणी छान चित्र/स्केच काढत आहेत, कॅरम, पत्ते यासारख्या खेळांना नवसंजीवनी मिळाली आहे.
आता आपल्याला अजून तीन आठवडे मिळाले आहेत. वेळेअभावी आतापर्यंत राहून गेलेल्या गोष्टी करण्याची, छंद जोपासायची, घरच्यांसोबत वेळ घालवायची नामी संधी!! घरात सर्वांसोबत कधी पुलंच्या पुस्तकांच अभिवाचन केलं आहे का? सर्वानी मिळून एकसूरात कधी ए. आर. रेहमान किंवा राहत फतेह अली खाऩ यांची गाणी आलाप घेऊन गाऊन पाहिली आहेत का? या छोट्या छोट्या गोष्टींनी पण खूप आनंद मिळतो. आपापले आनंदमार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. घरातील जुने अल्बम काढा, कपाटं आवरा, लेखन करा. Be Creative, अगदी TikTok video किंवा memes बनवले तरी चालतील. पण कार्यरत राहा. नुसते कोरोनाबद्दल msgs, TV channels आणि लॉकडाऊनच्या बातम्या पाहून उदास होऊन बसू नका. हि परिस्थिती पण कधी ना कधी निवळणारच आहे. परत एकदा रहाटगाडग्याला जुंपायचच आहे. त्यामुळे ह्या २१ दिवसांत पुढील २१ वर्ष पुरेल एवढी ऊर्जा मिळवायची आहे. चला तर मग लागा कमाला...
Stay at home, Be safe, Revitalise & Rejuvenate!
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

वृषाली पाठक

Monday, 23 March 2020

Chloroquine- new corona treatment on the horizon?

Nowadays 'prevention is better than cure' has become a famous phrase. Looking at the global scenario of corona infection, we surely know the importance of prevention and prophylactic techniques but what about the cure? As the patients are increasing worldwide it's equally important to treat them. Of Course, there are WHO guidelines for patient management but those are symptom-specific measures; there is no definitive treatment against the novel corona virus (SARS CoV-2).
In the view of huge mortality and morbidity due to COVID-19, research and clinical trials are booming up with respect to the new effective compounds, antivirals, combination therapies, etc.
New drug development is very costly and highly time-consuming process. The compound has to undergo many stages before it comes to the market which includes pre-clinical studies, 3 phases of clinical trials, FDA approval. The whole R&D process easily takes 12 years and millions of dollars.
One promising approach to fast track the situation is 'repositioning/repurposing of drugs'. This simply means the reuse of already licensed drugs for new medical conditions. As the drug is already in use (for another illness), its side effects, pharmacological properties have been studied before. However, FDA approval has to be taken for use in new disease conditions.
Antimalarial drug Chloroquine is currently in limelight for its possible use in COVID-19 prevention. Since the 1950's it has been introduced in the clinical practice and widely used as a first-line treatment in malaria. Chloroquine (CQ) interferes with the malaria parasite metabolism and kills it. In case of SARS CoV-2, it seems to affect the entry of viruses in the host cell and ultimately slows down the rate of replication. Also, it helps to modulate severe immune reactions which otherwise can lead to organ failure. So it may not achieve the killing effect but can still cripple the virus and will be useful in flattening the infection curve.
Scientists are very positive about the use of CQ in control of current pandemic based on their research on other corona viruses. Whereas it still has to undergo many safety and efficacy checkpoints for its use in COVID-19 control.
Several clinical trials are going on in various countries including China, France, US, Norway, etc. Something will definitely come out of the turmoil. Let's hold on to this glimmer of hope!

©Vrushali Pathak (Ph.D.)

Friday, 20 March 2020

कहानी घर घर की...

"अगं बाळोबा ४ महिन्यांचा झाला, खिमटी द्यायला सुरुवात कर... " "पण डॉक्टरांनी ६ महिन्यांपर्यंत दुधाशिवाय काही द्यायचं नाही सांगितलं आहे" इति बाळाची आई. "केवढे लोकं आले होते हॉलवर, दृष्ट काढून टाका मनीची... " "दृष्ट बिष्ट असं काही नसतं ग" एकासूरात छोट्या मनीच्या आईबाबांच उत्तर. आजकाल असे दोन पिढ्यांमधले विसंवाद प्रत्येक गोकुळात ऐकायला मिळतात.
आजच्या आधुनिक आईबाबांना दृष्ट काढणे, करदोडा बांधणे, टिट लावणे या गोष्टी अजिबात पटत नाहित. पण नातवंडांना दुधावरच्या सायीसारखं जपणाऱ्या आजीआजोबांना कशातच कसूर ठेवायची नसते. बाळाला धूरी देणे, डोळ्यात काजळ घालणे, मध चाटवणे, बाळघुटी देणे या गोष्टी डॉक्टरांनीच नाही सांगितल्यामुळे नवीन आईबाप थोडीच ऐकणार आहेत मागच्या पिढीचं. अर्थात प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय करणं असतात. धूरी दिल्यामुळे श्वसनाचे रोग उद्भवू शकतात, काजळामध्ये केमिकल्स असू शकतात, हातात बांधलेले दोरे ओले राहिल्यास त्यात बॅक्टरीयाची वाढ होते आणि तेच जर चुकून तोंडात गेले तर इन्फेक्शन होऊ शकते. पण या गोष्टी जर नीट समजावून दिल्या तर वादंग खचितच टळेल.
याचा अर्थ असाही नाही की पूर्वीच्या सर्व रीती हानिकारकच होत्या. डॉक्टर त्यांच्या निरीक्षणांचे ठोकताळे बांधून सरसकट सर्वानाच लागू करतात. पण प्रत्येक बाळ, त्याची प्रकृती, त्याची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. एका बाळाला आलेला अनुभव सर्वानाच येईल असं नाही. त्यामुळे इच्छेप्रमाणे, बेताने, अंदाज घेऊन काही गोष्टी केल्या तर खरच चालू शकते. वडीलधारी मंडळी बाळाच्या काळजीपोटी किंवा हितासाठीच तर सांगत असतात. त्यांच्या समाधानासाठी दृष्ट काढणे, पायात वाळे घालणे यासारख्या निरुपद्रवी गोष्टी केल्या तर बिघडते कुठे? प्रत्येक वेळी प्रॅक्टिकल विचार करण्यापेक्षा थोडं इमोशनल झालं तर काय हरकत आहे! दोन्ही पिढ्यांनी समन्वय साधून कुठेतरी सुवर्णमध्य गाठलाच पाहिजे तरच गोकूळ हसरे राहिल.😀😀 

वृषाली पाठक

Friday, 13 March 2020

कोरोनाची देणगी


कोविद १९ हा कोरोना फॅमिलीतला आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला व्हायरस. EBOLA, SARS, MERS या त्याच्या चुलतभावंडांबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. फक्त नावाने ओळखून आहेत. MERS, ज्याचा मृत्युदर सर्वात जास्त आहे, त्याचं तर नाव पण कुणी ऐकलं नसेल.
या कोरोनाने जनमानसात खळबळ उडवून दिली आहे. TV मीडिया तर क्रिकेटची लाइव्ह कॉमेंट्री करावी तसा प्रत्येक क्षणाचा रिपोर्ट देतोय. एखाद्या डिटेक्टीव्हप्रमाणे कुठल्या विमानातून किंवा टॅक्सीतून व्हायरसचा प्रसार झाला तेही शोधून काढले जातेय. रोज नवीन आकडेवारी कानावर पडतेय. आज या शहरात एवढे रुग्ण आढळले; राज्यातील किंवा देशातील रुग्णांची संख्या इथवर पोहोचली वगैरे वगैरे... मागच्या दशकात झालेल्या Whatsapp च्या उदयामुळे जनजागृती आता प्रचंड वेगाने शक्य झाली आहे. Facebook, Whatsapp द्वारे अनाकलनीय माहिती शेअर होतेय. जेम्स बॉण्ड चित्रपटातील प्लॉट वाटाव्या अशा कोविदच्या जन्मकथा, अफवा, memes, आयुर्वेदिक उपचार, कोरोना आणि इतर सर्दीखोकल्याच्या लक्षणांमधला फरक, माहितीपर परिपत्रके, प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा असंख्य गोष्टी वाचायला मिळत आहेत. कशावर विश्वास ठेवावा आणि काय आचरणात आणावे हेच समजत नाहीए. सर्वत्र सॅनिटायझर आणि मास्कचे panic buying सुरु आहे. अर्थातच यामध्ये काही चांगल्या गोष्टीपण आहेत ज्यामुळे मदतच होणार आहे. WHO ची वेबसाइट जर आपण बघितली तर जवळपास अर्ध पेज कोरोनाला अर्पण केलेलं आहे. अचूक माहिती आणि मार्गदर्शनासाठी ते जरूर पाहावे.
पण या सगळ्यामध्ये एकच बाब चांगली झालीये की आपण लोकांमध्ये सामाजिक स्वच्छतेबाबत जागरूकता आणू शकलो. एका meme मध्ये वाचलेलं कि यावर्षी कोरोनामुळे आपण हात धुवायला शिकलो; आणि हे तथ्य आहे अन्यथा किती लोकं वरचेवर सॅनिटायझर किंवा साबण लावून हाथ धुवायचे, किती लोकं समाजात वावरताना काळजी घ्यायचे? रस्त्यावर, गल्लीच्या कॉर्नरवर, लोकलमधून बाहेर पचापच थुंकणारे सवयीचे झालेले. आता थोडंसं खोकल तरी विचित्र नजरा झेलाव्या लागत आहेत. थोडक्यात म्हणजे आता लोकं शिष्टाचार पाळायला लागले आहेत. हे नव्याचे नऊ दिवस न राहोत हीच इच्छा.
हे नुकतेच आत्मसात केलेले Social Ethics आणि योग्य प्रतिबंधात्मक पाऊले याची सांगड घालून आपण नक्कीच कोरोना वर मात करू.
THANK YOU कोरोना.
तू तुझ्या वेगाने येशील आणि निघून जाशील, पण कायमचा लक्षात रहाशील.

वृषाली पाठक

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...