Friday, 25 February 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा

भाग १

बरंच पूर्वीपासून पॉंडिचेरी (आताचे पुदुचेरी) बकेट लिस्ट मध्ये होतं पण योग येत नव्हता. लहानपणापासूनच मला केंद्रशासित प्रदेशांबद्दल कुतूहल होतं, या ठिकाणांना वेगळा महत्व दिलंय भारत सरकारने. त्यात पाँडिचेरी सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या खूपच वेगळं.... 
हा केंद्रशासित प्रदेश चार विलग (एकमेकांपासून खूप दूर) जिल्ह्यांनी मिळून बनलेला आहे. पॉंडिचेरी आणि करैकल तामिळनाडू मध्ये तर यानम आंध्र प्रदेशात आणि माहे केरळमध्ये. या चारही प्रदेशात पूर्वी फ्रेंचांची वसाहत होती. १९५४ साली हे चार जिल्हे एक केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात विलीन झाले. आम्ही निघालो होतो पाँडिचेरी जिल्ह्यात, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि बाकी तीनही बाजूंनी तामिळनाडूने वेढलेला प्रदेश.... 
पाँडिचेरी साठी रस्त्याने आणि ट्रेनने साधारण २४-३६ तास लागतात. उपलब्ध वेळ आणि कुटुंबातील सदस्यांची वये (२ वर्षे ते ६८ वर्षे) लक्षात घेऊन विमानानेच जायचे ठरवले. चेन्नई विमानतळ ते पाँडिचेरी १४५ किमी चे अंतर ३ तासात पार करता येते. ध्रुवाचा हा पहिलाच विमानप्रवास म्हणून आम्ही खूप उत्साही होतो. कोणत्याही विमानप्रवासातील दोन गोष्टी मला फार आवडतात; एक म्हणजे टेक ऑफ च्या वेळी विमानाचा वेग, साधारण १८० तशी किमी वेगाने विमान रनवे वर धावू लागते तेव्हा खूपच रोमांचक वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर विमान रात्रीचे असेल तर टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे रस्ते आणि त्या प्रदेशाची (विशेषतः मुंबईची) आऊटलाईन.... 
आम्ही जाताना सकाळी लवकर आणि येताना संध्याकाळी उशिरा अशी विमानाची तिकिटे काढली होती म्हणजे येण्याजाण्याच्या दिवसाचा पण वेळ मिळाला. विमानाने साधारण दोन तासात आम्ही चेन्नईला पोहोचलो. आधीच ZoomCar अँपने कार निश्चित केली होती. त्यात बसून आम्ही निसर्गरम्य अशा ईस्ट कोस्ट रोडने (ECR) महाबलीपूरम च्या दिशेने निघालो. 
महाबलीपूरम हे चेन्नईपासून ५५ किमी अंतरावर, एक बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला ग्रेट सॉल्ट लेक यामध्ये वसलेलं आणि दगडाच्या वास्तुशिल्पांसाठी प्रसिद्ध असं शहर आहे.पुरातन काळात हे एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. पल्लव वंशातील पहिला राजा नरसिंहवर्मा याच्या महामल्ल किंवा मामल्ल या उपाधी वरून हे स्थळ मामल्लपूरम म्हणूनही ओळखले जाते. येथील जागतिक वारसा स्थळांचा (युनेस्को हेरिटेज साईट) मान मिळालेली, अखंड दगडात कोरलेली वास्तूशिल्प प्रेक्षणीय आहेत. 
पंच रथ मंदिर, अर्जुनाची तपश्चर्या/ गंगा अवतरण शिल्प हि प्रमुख शिल्प बघून आम्ही महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावरील शोअर टेम्पल (Shore temple) कडे मोर्चा वळवला. हा तीन मंदिरांचा समूह अगदी किनाऱ्यानजीकच घडवला आहे. २००४ सालच्या प्रलयकारी त्सुनामीला तोंड देऊन आजही हे शिल्प दिमाखात उभं  आहे.

पंच रथ मंदिर
 
शोअर टेम्पल
रणरणत्या उन्हात फोटो आणि सेल्फी काढत आमची भटकंती चालू होती. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचाच काय तो आधार! बाजूने कुंपण असल्यामुळे समुद्र समोर दिसत असून सुद्धा फक्त नयनसुख घ्यावे लागले. महाबलीपुरमला सोनेरी वाळूचा सुंदर किनार लाभला आहे. वेळेअभावी बरीच शिल्प आम्हाला बघता आली नाहीत पण कृष्णा बटरबॉल, वराह मंदिर, गणेश मंदिर, दीपगृह ही  स्थळंपण आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. सरत्या दुपारी आम्ही पाँडिचेरी च्या दिशेने परत ईस्ट कोस्टल रास्ता पकडला. 

इस्ट कोस्टल रोड
क्रमशः

No comments:

Post a Comment

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...